Tuesday, May 24, 2011

आभाळमाया ....


अरे बापरे!! ७. २५ झाले निघायला हव मला नाहीतर माझी नेहमीची लोकल निघून जाईल. धावतपळत मी स्टेशन गाठले... ट्रेन नुकतीच येत होती. मी जवळ जवळ पळतच पकडली ट्रेन आणि माझी नेहमीची खिडकीजवळची जागा पकडली. ट्रेनला तशी फारशी गर्दी नव्हती. मी माझ्याशेजारची जागा राखून आरामात बसले. २- ३ स्टेशन गेल्यावर हळूहळू गर्दी वाढायला लागली. पुढच्याच स्टेशनवर गाडी थांबली अन मला ओळखीचे स्मित दिसले...जिच्यासाठी मी माझ्या शेजारची जागा अडवली होती.

" सविता " माझी ट्रेन मधली नवीन मैत्रीण!! पण खूप जुनी ओळख असल्यासारखी वाटायची. मध्यम बांधा, सावळा वर्ण, लांब केसांची एक वेणी अन नेहमीच कडक इस्त्रीची साडी अस ते आजच्या काळातल अजब समीकरण होत. वयाची पस्तीशी ओलांडली असेल तरीही अजून तरुण मुलींना लाजवेल इतकी निरागस, गोड होती. तिच्या चेहऱ्यावर तिचं वय कधी दिसलेच नाही ...कदाचित ते तिच्या बोलक्या डोळ्यांमध्ये किंवा गोड हास्यामध्ये लपून जात असावे. एक विलक्षण व्यक्तिमत्व !! गर्दीतही उठून दिसणारी ...माझी प्रिय मैत्रीण सविता !! तिला पाहिलं कि मन अगदी प्रसन्न होऊन जाई. आमच्या गप्पा अगदी घरापासून ते राजकारणा पर्यंत चालायच्या अगदी मनसोक्त ...कितीही आणि कधीही... तीच स्टेशन येईपर्यंत आमची बडबड चालायाची. मी कधी एकदा तिला भेटतेय अस होऊन जायचं मला म्हणून तर माझी ठरलेली ट्रेन मी कधी चुकवायची नाही. ती तशी वाणिज्य शाखेची पदवीधर होती. पूर्वी कधी काळी ती बँकेत नोकरीलाही होती म्हणे पण आता ती एका मुकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिकेचे काम करत होती. एवढी बोलकी मुलगी त्या शाळेत मुक्या मुलांशी कसा बर संवाद साधत असावी याचेच मला राहून राहून आश्चर्य वाटायचे.

" काय ग!! कुठे हरवली आहेस मंद ? " अस बोलून ती माझ्या शेजारी येऊन बसली सुद्धा ...
"काही नाही ग असंच ..उगाच काहीतरी.."
"का ग! काय झाल ? कुणाशी भांडण झाल कि काय तुझ ? " आमचा विषय असा कुठूनही कसाही सुरु होतो अगदी न सांगता ....
" हे घे !! तुझ्यासाठी chocolate "
" कशाबद्दल ग ? तुझा तर आज वाढदिवस नाही आहे." मी उगाच चौकसपणे विचारलं.
" अरे काही नाही ग असंच ..सहजच " माझ्या नजरेला नजर न देता तिने अडखळतच उत्तर दिल. का ? कुणास ठाऊक .. पण मला ते खटकल. या आधी तिने कधी अस अडखळत उत्तर दिल नव्हत ..
" सांग ना ग !! कशाबद्दल ते ..तू काहीतरी लपवते आहेस ." तशी माझी आणि तिची जुनी ओळख नसली तरी आतापर्यंत आम्हाला एकमेकींच्या सवयी चांगल्याच माहित झाल्या होत्या.
" अरे आज शाळेत एका मुलाचा वाढदिवस होता. म्हटलं तुला द्याव म्हणून दिल बस !!एवढंच आणि काही नाही."

तिने अगदी सहजपणे विषय टाळला आणि आमच्या नेहमीच्या गप्पा सुरु झाल्या. मला राहून राहून तिचं वागण फार वेगळ वाटत राहील. नेहमी प्रमाणे तिने गोड निरोप घेतला पण घरी येतानाही माझ्या डोक्यात मात्र विचारचक्र सुरु होत. ती तशी चांगली मुलगी होती अगदी कोणालाही आवडेल अशीच पण तिचं अजून लग्न झाल नव्हत... का तिने केल नव्हत? या विषयावर अजून आमच बोलण झालच नव्हत कधी..का तिने जाणून बुजून हा विषय टाळला होता ? माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरु होत...उद्या तिला नक्की विचारायचं अस मी मनाशी ठरवल.

दुसर्या दिवशीही नेहमीप्रमाणे गोड हसत माझ्या शेजारची तिने जागा घेतली. आमच्या गप्पा तर सुरु होत्या अन अचानकच मी प्रश्न केला
" काय ग!! तू अजून लग्न का नाही केलंस ? " बोलता बोलता ती एकदम गप्पच झाली.
" असं का ग विचारलास एकदम? "  माझी नजर टाळून ती बोलतेय हे मला कळत होत ...
" सविता प्लीज आज काही लपवू नकोस. मी बऱ्याच दिवसांपासून पाहतेय तू लपवतेयस काहीतरी...सगळ्यांचे सगळे प्रोब्लेम सोडवत बसतेस अन स्वतःचे दुःख मात्र हसऱ्या चेहऱ्यामागे लपवतेस...एवढी पण का ग मी जवळची नाही तुला? सांग न काय झालंय? काय लपवतेयस ?"
" नाही ग!! काही नाही." बोलता बोलता तिचे डोळे पाण्यानी भरले..
" अरे वेडी काय झाल ? रडतेयस का? जाऊ देत नको सांगूस.. मी नाही विचारणार पुन्हा..पण तू रडू नकोस ग ..माझी सविता कधी रडत नाही. " मी उगाच समजावणीच्या सुरात बोलले.
नंतर स्वतःला सावरून ती बोलली " किती ठरवल तरी शेवटी मी पण माणूसच आहे...कोणी असं बोलले कि मला राहवत नाही. सांगते मी.. आज तुला सार काही सांगते ...पण ट्रेन मध्ये नको आपण उतरुया का पुढच्या स्टेशनला ? निवांतपणे बोलू."
आज काहीही झाल तरी तिच्या मनातलं मला जाणून घ्यायचं  होत म्हणून आम्ही दादरला उतरलो. पुढे गर्दीतून वाट काढत आम्ही शिवाजीपार्क गाठलं आणि एका शांत जागेवर निवांत बसलो.
" तुला जाणून घ्यायचं होत ना मी अजून लग्न का नाही केल ते ? " माझी होकारार्थी मान हलताच ती पुढे बोलू लागली ...
"तुला ठाऊक आहे मी तुला बोलले होते मी आधी बँकेत नोकरीला होते. तिथे माझा एक सहकारी होता ..' उदय ' नाव होत त्याच !! अगदी नावाप्रमाणेच होता तो ..उत्साही, प्रसन्न अन बोलका अगदी माझ्याच सारखा....पुढे चहाच्या गप्पा नंतर ऑफिस सुटल्यावरही होत राहिल्या अन आम्ही कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो आमचे आम्हालाही कळले नाही. कुणीच कुणाला लग्नासाठी विचारल नव्हत पण एक दिवस उदय सकाळपासून फार अस्वस्थ वाटत होता. ' तुला काहीतरी सांगायचं आहे..आज भेट मला ऑफिस सुटल्यावर !' एवढंच बोलला. नेहमीप्रमाणे आम्ही भेटलो अन त्याने जे काही सांगितलं त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. उदय घरातलं शेंडेफळ ..त्याच्या दादाचा ३ वर्षांपूर्वीच घरच्यांच्या मर्जीविरुद्ध प्रेमविवाह झाला होता. म्हणून तो वेगळा राहत होता. त्याच्या वडिलांना अर्धांगवायूचा आजार जडला होता अन आईला आता वयोमानानुसार ऐकू कमी येत होत. उदयच म्हणण होत कि त्याच्या दादामुळे त्याच्या आई वडिलांना जो मनस्ताप झाला होता, ते त्याने पाहिलं होत. ते सगळ आता परत आमच्या प्रेमामुळे पुन्हा होऊ नये असं त्याला वाटत होत.

" दादाच्या लग्नानंतर मी ठरवलं होत कि मी आई वडिलांच्याच मर्जीने लग्न करणार. या वयात आता आई बाबांना मला अजून कोणताही त्रास नाही दयायचा आहे...त्यांनी माझ्यासाठी, आमच्या घरासाठी खूप काही केल आहे...सविता माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मलाही माहित आहे कि तू हि माझ्याशिवाय नाही राहू शकत. पण माझा नाईलाज आहे ग..मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. आपल्या प्रेमाला नाव नाही देऊ शकत..माफ कर मला मी तुझा अपराधी आहे. खरतर मी तुला हे आधीच सांगायला हव होत... पण तुझ्या प्रेमामुळे मला सगळ्यांचाच विसर पडला होता. काल आईने लग्नाचा विषय काढला तेव्हा मला एकदम तूच आठवलीस अन मी अस्वस्थ झालो.. " त्याच्या या बोलण्यानंतर तर माझ जग तर थांबलच होत. पण तो बोलत होता, " मी आयुष्यात पहिल्यांदाच आणि शेवटचंच प्रेम केल. मी प्रेमविवाह करणार नाही अस ठरवल होत पण तुला भेटल्यानंतर आता लग्नच करायचं नाही असंच ठरवला आहे मी. तुझी जागा कोणीही नाही घेऊ शकत आणि नाही मला ती कोणाला दयायची आहे. सविता, पण तुला मी अडवणार नाही. तू लग्न करू शकतेस..तुझ्या इच्छेनुसार आणि त्यावर माझी काहीच हरकत नसेल उलट माझ्याहीपेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम करणार कोणी तुला भेटलं तर मलाच जास्त आनंद होईल. पण मी आपल्या नात्याला शेवटपर्यंत नाही नेऊ शकत..माझ्यात ती हिम्मत नाही म्हणून नाही तर माझ्या आईवडिलांना दिलेलं वचन मी नाही मोडू शकत म्हणून मी असं बोलतोय. प्लीज मला चुकीच समजू नकोस ...मी तुझा खरच गुन्हेगार आहे. तू देशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे.मी तुझ्या माफीचा लायक नक्कीच नाही आहे. सांग !! काय करू मी ? "

त्याच्या या बोलण्याने मी भानावर आले. पण का कुणास ठाऊक मला त्याचा राग येत नव्हता उलट त्याला असं पाहून मलाच त्रास होत होता. " उदय, तू खरच प्रामाणिक आहेस..आई वडिलांना दिलेल्या वचनाबाबतही अन आपल्या प्रेमाबाबातही ...तुझ्या बोलण्याने तर खूप त्रास झाला पण आईवडिलांसाठी तू जो निर्णय घेतला आहेस, जो त्याग करणार आहेस त्याचा अभिमानही वाटला...उदय तुझे आईवडील खूप भाग्यशाली आहेत म्हणून त्यांना असा मुलगा मिळाला अन मी हि जिच्या नशिबात तुझे प्रेम होते.. शिक्षा वगैरे काही नाही उदय पण मी हि तुझी जागा कोणाला नाही देऊ शकत आणि तुला जन्मभर साथ देता येणार नाही म्हणून मलाच मी शिक्षा लादून घेणार आहे ती म्हणजे आजन्म अविवाहित राहण्याची ..."

त्यानंतर मी ऑफिस मध्ये जेमतेम आठवडाभर राहिली असेन पण आयुष्यात कधीही उदय आपला होणार नाही हे मी सहन नाही करू शकले अन लगेचच मी राजीनामा देऊन माझ्या गावाला निघून गेले. त्यानंतर उदय अन माझा संपर्कच तुटला..खरतर मीच जाणून बुजून तोडला होता कारण मी हे सगळ सहन नाही करू शकत होते. मग जवळपास काही महिन्यांनी मी पुन्हा मुंबईला परतले अन शिक्षिकेचा कोर्स करून आताच्या या शाळेत रुजू झाले. या मुलांनी मला जीवन नव्याने शिकवले अन माझे हरवलेले हास्य मला पुन्हा मिळवून दिले. उदयने त्याच्या आई वडिलांसाठी आमच्या प्रेमाचा त्याग केला अन मी दुसर्यांचे हास्य जपण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा त्याग केला....लग्न तर मलाही करायचं होत ग, पण उदयची जागा मी कोणालाही नाही देऊ शकत अगदी स्वप्नातही... त्यामुळे मला माझ्या निर्णयाची जराही खंत वाटत नाही. तेव्हा आता यापुढे मला कधीही विचारू नकोस मी लग्न का केल नाही ते आणि का करणार नाही ते...आता मिळाल का तुझ्या प्रश्नच उत्तर ? मग आता जायचं का? उशीर होईल. " असं बोलून ती उठलीही ..अन मी हि तिच्या पाठोपाठ काही न बोलता चालू लागले..

मनात एक विचार मात्र डोकावून गेला " प्रेम म्हणजे नेहमीच घेण नसत किंवा मिळवण नसत... ते फक्त देत अगदी निस्वार्थपणे...अन असं निस्वार्थ प्रेम करण अन निस्वार्थ प्रेम देण हे सगळ्यांनाच जमत नाही त्यासाठी मन खूप मोठ असाव लागत.....आभाळाएवढं !! "


कोमल नागवेकर ........................२६/३/११

No comments:

Post a Comment